Type Here to Get Search Results !

Alandi समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांना जीवन गौरव पुरस्कार

सत्कार सोहळा हरिनाम गजरात ; धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रावण महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समारोप आळंदी येथे मोठ्या भक्तिभावात झाला. आठ दिवस सुरू असलेला धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा आळंदी  येथील श्रीम.चंद्रकला भीमाशंकर खोल्लम सभागृहात हरिनाम गजरात साजरा झाला. यावेळी संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित समाजसेवक व दातृत्वासाठी संपूर्ण देशात ओळखले जाणारे शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   संत नगरीतील या सोहळ्याला दररोज शेकडो भाविकांनी उपस्थित राहून नामस्मरण लाभ घेतला. समारोप प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित समाजसेवक व दातृत्वासाठी संपूर्ण देशात ओळखले जाणारे शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा सन्मानपत्र, संत तुकाराम महाराज पगडी, वीणा, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच संजय फुलसुंदर यांचा ही तुकाराम महाराज पगडी,शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे,पत्रकार संघाचे पदाधिकारी नवनाथ जाधव, मनोहर धुमाळे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजोक काळदंते, उपाध्यक्ष रविंद्र बेल्हेकर, सचिव तृप्ती टकले, सहसचिव पुष्पा निघोजकर, खजिनदार राहुल निघोजकर, डॉ.विशाल खोल्लम, माजी अध्यक्ष सचिन टकले, विश्वस्त प्रमोद खोल्लम, राजू बेल्हेकर, हेमंतकुमार टकले, विनायक बेदरकर, गणेश बेल्हेकर, सुपर्णा बेल्हेकर, सल्लागार नंदकुमार टकले, बेल्हेकर आणि आळंदी परिसरातील संतप्रेमी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानात ज्यांचे नाव दातृत्व आणि समाजसेवेच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते अशा नानजीभाई ठक्कर यांना या पवित्र संत नगरीत पाहण्याचा योग लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी या कार्यक्रमा विषयी सांगितले तेव्हा मी येथे येण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना डॉ.विश्वासराव आरोटे यांनी नानजीभाईंच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की त्यांनी आजवर ७० ते ८० हजार मंदिरे उभारली आहेत. मंदिर बांधणे असो वा रुग्णाच्या ऑपरेशनचा खर्च असो, कोणताही विषय असो ते निःस्वार्थपणे मदत करतात. आळंदीच्या इंद्रायणी काठी त्यांनी २०० फूट उंच,तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करून भव्य मंदिर उभारले आहे. याशिवाय दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना १०० क्विंटल बुंदीचा प्रसाद वाटण्याची सेवा ते करतात असे त्यांनी सांगितले. डॉ.विश्वासराव आरोटे यांनी नानजीभाईंच्या दिनचर्येचे वर्णन करताना सांगितले ८५ वर्षांचे असूनही ते पहाटे साडेतीन वाजता उठतात आणि सकाळी आठ वाजता कार्यालयात पोहोचतात. त्यांच्या कार्यालयात वर्षभर लोकांची वर्दळ असते.अनेकदा त्यांच्या दौर्यांदरम्यान पोलीस संरक्षण द्यावे लागते,पण आळंदीला येताना ते स्वतःच सांगतात की येथे मला कोणत्याही संरक्षणाची गरज नाही. ते गुजरात दौ-यावरून आले असूनही या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले हे त्यांचे प्रेम आणि समाजसेवेतील बांधिलकी दर्शवते. नानजीभाईंच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन ते मदत करतात.त्यांच्या कार्यात भेदभावाला स्थान नाही. जेव्हा कधी ते दातृत्व करत नाहीत, तो दिवस त्यांना अपूर्ण वाटतो असे डॉ.आरोटे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी,स्थानिक भाविक,दिंडी क्र.५४ चे सर्व पदाधिकारी महिला मंडळ यांनी मेहनत घेतली.आठ दिवस चाललेल्या या सोहळ्यात पारायण, हरिनाम सप्ताह, किर्तन, भजन तसेच संतवाङ्मयाच्या वाचनामुळे आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे केवळ अध्यात्मिक वातावरणच नव्हे तर समाजसेवा, दातृत्व आणि संत विचारांचा संदेशही भाविकांपर्यंत पोहोचला. समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांची उपस्थिती आणि डॉ.विश्वासराव आरोटे यांचे प्रेरणादायी भाषण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


Post a Comment

0 Comments