आळंदी नगरपरिषदेचा वारक-यां तर्फे जाहीर निषेध ; दिंडीसह हरिनामाचा गजर
आळंदीत अधिक तीव्र आंदोलनाचा खणखणीत इशारा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड सुरू आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच नदीचे घाट पूर्ववत करून देण्याचे मागणीसाठी हरिनाम गजरात पुण्यात वारकरी भाविकांनी आंदोलन केले. यापुढील काळात या मागणीसाठी अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला.
आळंदीतील घाटाची तोडफोड प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा, संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतिने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन लक्ष वेधत या प्रकरणी लक्ष घालण्याचे साकडे यावेळी वारकरी भाविक, दिंडीकरी यांनी घातले.
यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी वारकरी, भाविकांना आश्वासन देत संबंधित मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविल्या जाईल. उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना हभप धर्मराज महाराज हांडे, हभप महेश महाराज नलावडे, हभप शालीकराम महाराज खंदारे, हभप तुकाराम महाराज कापसे आणि आळंदीचे हभप संतोष महाराज सांगळे यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले वारकरी उपस्थित होते.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च करून लोक वर्गणीतून घाट विकसित करून आळंदीचे वैभवातवाढ करण्यात आली आहे. या माध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या कार्यासाठी एमआयटीचे डॉ. विश्वनाथ दा. कराड, वै.किसन महाराज साखरे, वै. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर व वै. धुंडा महाराज देगलूरकर तसेच संप्रदायातील शेकडा थोर मान्यवरांनी पुढाकार घेतला होता. तसेच येथे घाटाचे सुंदर रेखीव व कोरीव कार्य सुरू आहे. दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचे व्यवस्थापन, तिर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे हा वारकरी व समाजातील लोकांसाठी अभिनव उपक्रम सुरू आहे. सुमारे १४५ फूट उंच सुवर्णजडित गरूड स्तंभाची निर्मिती ही सौदर्यात भर पाडणारी आहे.
सध्या स्थितीला येथे सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी नलिका टाकण्याचे जे काम सुरू आहे. त्यामुळे वारकरी भाविक भक्तांचे मन दुखावलेले आहे. याच भाविकांनी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ घाटाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देऊन एक एक दगड लावला आहे. सध्या घाटाची दुरावस्था पाहून अंतकरणात तिव्र वेदना होत आहे. त्यामुळेच उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देत घाटाचे विद्रुपीकरण तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. समस्त वारकर्यांनी शांततामय मार्गाने भजन, हरिनाम गजर करीत आळंदी नगरपरिषदेचा निषेध केला. यावेळी कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्या तर्फे हभप महेश महाराज नलावडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.


Post a Comment
0 Comments